कवयित्री शांताबाई शेळके अस म्हणत,' जगण म्हणजे अनंत प्रश्नांना तोंड देणे. सुखासीन सामान्य अवस्थेत आपल्याशी असलेल्या निर्मितीक्षम गुणांचा आपणास पत्ता नसतो. ते गुण बिकट अवस्थेत जास्त आवेगाने उसळून येतात व त्यातून आपल्याला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. अशा पद्धतीने स्वतःची ओळख निर्माण करणारी माणस समाजात दुर्मिळ असतात.' या विचारांशी जुळणार माझ्या दृष्टीने मी आजपर्यंत पाहिलेल्या व्यक्तींमधील एक नाव म्हणजे समाजश्रेष्ठी स्व. जगन्नाथभाई पेडणेकर होय.
परमेश्वराने दिलेले आयुष्य हे स्वतःतील कर्तृत्व, नेतृत्व तसेच दातृत्व याद्वारे वेळोवेळी भाईनी सार्थ ठरवले आहे. वक्तृत्व ही भाईंना मिळालेली हे दैवी देणगी होती. सहज, सोप्या, मधुर शब्दातून उपस्थितांना जिंकून घेत.
लांजा तालुक्यातील तळवडे हे जगन्नाथभाईंचे मूळ गाव. तळवडेचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर व गावातील हायस्कूल या दोहोंवर भाईंच विलक्षण प्रेम होते. तळवडे मध्ये त्यांचे येणे म्हणजे चैतन्य निर्माण करणारे असायचे. त्यांचे सहकारी, ग्रामस्थ आवर्जून भाईंच्या स्वागतासाठी आपुलकीच्या भावनेने उपस्थित राहत असत. गावात व हायस्कूल मध्ये झालेल्या चांगल्या कामांच कौतुक करत शाबासकीची थाप देत असत. गरजवंतांच्या पाठीशी तन, मन, धनाने उभे रहात असत.
भाईंचे बोलणे हे मिश्कील आणि नर्म विनोदी होते. मोजके पण मौलिक असायचं. त्याचवेळी जे बोलणार ते मनापासून व आश्वासक असे. त्यांच्या त्या शब्दानी मनामनाचे सेतू सहजपणे बांधले जायचे व निर्माण झालेले ऋणानुबंध चिरकाल टिकायचे.
भाई नेहमी म्हणत, " नीतीमत्तेचे काम करत असाल असाल तर तुमच्या पंखांना बळ देण्याचे काम आम्ही करू". असे मनाला खंबीर करणारे त्यांचे शब्द अनेकांसाठी त्यांच्या त्यांच्या जीवनात नक्कीच दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले असतील. आपण कितीही यशस्वी झालो तरी परिस्थितीची जाण ठेवून, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना न दुखावता त्यांना मदत करणे या अशा इतर गोष्टी भाईनकडून शिकण्यासारख्या होत्या.
तळवडे प्रमाणेच दैवैज्ञ समाजावरही भाईनी उदंड प्रेम केले. आर्थिक , सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात दैवज्ञ समाज अग्रेसर राहिला पाहिजे असे त्यांना मनापासून वाटत असे. ते दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष होते. जेथे जेथे दैवाज्ञांची वसती, तेथे तेथे दैवज्ञ भवनांची निर्मिती हे जणू धेयवाक्य ठरल्याप्रमाणे आपल्या सहकार्यांच्या जोडीने वाशी, सांगली, मालवण, सावंतवाडी, फोंडा गोवा, रत्नागिरी आदी ठिकाणी दैवज्ञ भवनांची उभारणी करण्यात आली. त्यामुळे समाज एकत्र येण्यास हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले. त्याचबरोबर महिलांसाठी, युवकांसाठी अनेक विभाग निर्माण केले गेले. त्यातून अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्नही सुटला. भाईंच्या नेतृत्वाखाली दैवज्ञ परिषदेचे कार्य चौफेर सुरु झाले. ते आज तागायत चालू आहे असे त्यांचे सहकारी सांगतात.
तळवडे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दार खुली व्हावीत या उद्देशाने तळवडे ग्रामस्थ, हितचिंतक व भाईनी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर विद्यालय तळवडेची निर्मिती केली. तळवडे येथील कार्याचा सर्वांना निश्चित अभिमान आहे.
जगन्नाथभाईबद्दल प्राचार्य श्याम भुर्के म्हणतात, ' एखाद्या कॅलीडोस्कोपमधून म्हणजे शोभादर्शकातून पाहिल्यास एक सुंदर आकृती दिसते. तो शोभा दर्शक थोडा फिरविल्यास पुन्हा एक सुंदर आकृती दिसते. भाईंचे जीवन असेच आहे. त्यांचे विविध पैलू आपल्याला दिसू लागतात. यशस्वी उद्योजक हा पहिला पैलू दिसतो. कॅलिडोस्कोप जरा फिरविल्यास त्यांचे शैक्षणिक कार्य दिसून येते. महाराष्ट्र सुवर्णकार महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष, दै. स.प.चे ३० वर्षे अध्यक्ष, राजकीय कला क्षेत्रातील प्रचंड जनसंपर्क, उदारहस्ते आर्थिक मदत करणारा दाट असे अनेक पैलू डोळ्यांपुढे येत राहतात.' भाईसाठी प्रत्येक वर्ष नवनिर्मितीचे व सेवाभावनेने भारलेले असायचे. आज भाईंचा स्मृतिदिन आहे. 14 व्या स्मृतिदिनानिमित्त भाईंना भावपूर्ण आदरांजली!!
- श्री. प्रकाश हर्चेकर, लांजा
30/June/2024
No comments:
Post a Comment